रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळीच्या तोंडावर रावेर तालुक्यातील २९९ विधवा महिला इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना पेंशनपासून वंचित राहिल्या आहेत. मागील पाच ते सहा महिन्यांपासून तांत्रिक अडचणीमुळे या महिलांना पेंशन मिळत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे.
तहसील कार्यालयात पेंशनबाबत माहिती घेण्यासाठी आलेल्या महिलांनी सांगितले की, “या पेंशनवरच आमचा उदरनिर्वाह चालतो. मात्र,अनेक महिन्यां पासून पेंशन न मिळाल्याने घरखर्चाचा ताळमेळ बसत नाही.”

स्थानिक पत्रकारांनी तहसील कार्यालयात चौकशी केली असता, ही पेंशन योजना पूर्वी ऑफलाइन पद्धतीने चालत होती. मात्र, डिसेंबर 2024 पासून ऑनलाइन प्रणाली लागू झाल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी, २९९ विधवा महिलांचे पेंशन थांबले आहे.
हा प्रश्न केवळ रावेरपुरता मर्यादित नसून, संपूर्ण जिल्ह्यातील महिलांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे स्थानिक महिला वर्गात नाराजीचे वातावरण आहे. महिलांनी मागणी केली आहे की, या समस्येकडे मंत्री रक्षा खडसे आणि आमदार अमोल जावळे यांनी तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आमची “दिवाळी होणार नाही”



