धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जलजीवन मिशनच्या अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत नळाचे शुध्द पाणी पुरवण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून मुसळी येथे याच योजनेतून नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होत असल्याचा आपल्याला आनंद आहे. ही पाणी पुरवठा योजना मुसळी गावाला नवसंजीवनी प्रदान करेल असा आशावाद पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
जल जीवन मिशन योजने अंतर्गत मुसळी येथे ७६ लाखाच्या पाणी पुरवठा योजनेचा व ३२ लाखाच्या गावंतर्गत विविध विकास कामांचा असा एकूण १ कोटी च्या कामांचा शुभारंभ राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधीवत पूजा करून करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना पालकमंत्र्यांनी आपण परिसरातील विकासकामांना प्रचंड गती दिली असून मुसळी ते वराड रस्ता डांबरीकरणाला प्राधान्य देण्यात येणार असल्याची ग्वाही दिली.
जलजीवन मिशनच्या अंतर्गत जिल्ह्यातील बर्याच ठिकाणच्या कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. या अनुषंगाने याच योजनेच्या माध्यमातून धरणगाव तालुक्यातील मुसळी येथे ७६ लाख रूपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून याचे तसेच इतर अन्य कामांचे भूमिपुजन ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यानिमित्त आयोजीत कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, माजी सभापती प्रेमराज पाटील, मुकुंदराव नन्नवरे, अनिल पाटील, माजी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, ग्रा.पं. सदस्य सुरेश गुंजाळ, विनायक पाटील, राध्येशाम तोतला , शंकर पाटील, सरपंच गणेश ढमाले, उपसरपंच अजाण शेख मण्यार, माजी सरपंच वसंत पाटील, गोकुळ नाना पाटील, नवल पाटील,शाखा प्रमुख पुंडलिक पाटील, मुरलीधर पाटील, माजी सभापती भगवान पाटील, दिलीप अण्णा पाटील, मंगल अण्णा पाटील, सुखराम पाटील, अर्जुन पाटील , मोतीअप्पा पाटील, मोहन पाटील, ठेकेदार शांताराम पाटील, ग्रामविकास अधिकारी डी. डी. पाठक, विष्णुभाऊ कोठारी, रविंद्र पाटील, दिलीप धनगर, चंद्रशेखर भाटीया, विभागप्रमुख गोकुळ लंके, रामचंद्र पाटील , विनायक पाटील यांच्यासह ग्रामस्थ व परिसरातील सरपंच व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
पाणीपुरवठा योजनेमध्ये या बाबींचा आहे समावेश
मुसळी गावाला भविष्यात पाणी टंचाई होऊ नये यासाठी कायमस्वरुपी पाणी पुरवठा गावाला व्हावा यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा मंजूर केली असून प्रत्यक्षात कामाला आजपासून सुरुवात देखील करण्यात आली आहे. या योजनेत योजनागावापासून हायवेला लागून असलेल्या गाव विहिरी लगत नवीन विहीर खोदून एक लाख लिटरचे जलकुंभ बांधकाम, वाढीव प्लॉट वस्तीत पाईपलाईनचे काम आणि महत्वाचे म्हणजे पाण्याचा स्रोत (विहीर बांधकाम) हायवेलगत जुन्या पाण्याच्या विहिरीलगत मोठी विहीर खोदून तेथून मुसळी गावाला पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. यासाठी पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ७६ लाख रुपये मंजूर केले असून पालकमंत्र्यांच्या हस्ते आज पाणीपुरवठा योजनेचा प्रारंभ करण्यात आला. यासोबत ३२ लाख निधीतील गावंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले यात २५१५ मधून पेव्हींग ब्लॉक बसवणे, दलितवस्तीत कॉंक्रिटीकरण , कॉंक्रीट गटार बांधकाम, रस्त्याचे कॉंक्रिटीकरणकरणे, स्मशानभूमी रस्ता कॉंक्रिटीकरण तसेच १५ व्या वित्त आयोगातून पेव्हर ब्लॉक बसविणे, सामाजिक न्याय अंतर्गत दलित वस्तीत कॉंक्रिटीकरण गटार बांधकाम करणे अश्या एकूण १ कोटीच्या कामांचे भूमिपूजन यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
अरुण मंत्री यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार !
यावेळी गावातील स्मशानभूमीसाठी दातृत्वाची भावना ठेवून स्मशानभूमीकरीता जागा देणार्या अरुण मंत्री यांचा शाल श्रीफळ देऊन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विकासकामांसाठी कटीबध्द : ना. गुलाबराव पाटील
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून मुसळी गावासोबत असणार्या आपल्या ऋणानुबंधाला उजाळा दिला. ते म्हणाले की, गावातील साधासुधा गुलाब ते आजचा मंत्री गुलाबराव ही सर्व वाटचाल मुसळीकरांच्या समोरच झालेली आहे. मुसळी गावाने आपल्यावर कायम प्रेम केले असून मी देखील या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता नवीन पाणी पुरवठा योजना ही मुसळीकरांना नवसंजीवनी प्रदान करणार असल्याचे सांगत या योजनेच्या अचूक कार्यान्वयनासाठी ना. गुलाबराव पाटील यांनी कंत्राटदारांसह स्थानिक लोकप्रतिनिधींना सूचना दिल्या. याचे काम अचूकपणे आणि तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिलेत. दरम्यान, मुसळीसह परिसरातील रस्त्यांची कामे देखील लवकरच पूर्ण करण्यात येणार असून यात प्रामुख्याने मुसळी ते वराड आणि दोनगाव ते आव्हाणी या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. के.पाटील यांनी केले तर प्रास्ताविक शिवसेनेचे गोकुळ नाना पाटील यांनी केले तर आभार गणेश ढमाले यांनी मानले.