भुसावळ प्रतिनिधी । शहरात नगरसेवक व विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने परिसरात विविध भागात वृक्ष लागवडीसाठी कर्नाटक येथून विविध प्रजाती रोपे आणण्यात आली होती. ही रोपे नगरपरिषदच्या जलशुध्दीकरण केंद्रात ठेवण्यात आली. मात्र, नागरिकांनी त्या रोपांची लूट केल्याचा प्रकार दि.2 ऑगस्ट शुक्रवार रोजी घडला आहे. यामुळे पालिकेचा नियोजन शुन्य कारभार चव्हाट्यावर आला आहे.
याबाबत माहिती अशी की, नगरपरिषदेचे नगरसेवक व शहरातील विविध सेवाभावी संस्थांच्या मदतीने परिसरात विविध भागात वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली आहे. त्याकरिता कर्णाटक मधुन विविध प्रजातींची 8 ते 12 फूट उंचीची रोपे लागवडीसाठी आणली होती.
महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगाव जिल्ह्यात आगमन होत आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची डागडुजी व वृक्षारोपण करून शहरातील सौंदर्यात भर घालण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला होता. मात्र वृक्षारोपांची लूट झाल्याने पालिकेचा नियोजन शुन्य कारभार चव्हाट्यावर आला आहे. पालिकेने 10 हजार वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 5 हजार रोपे पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात ठेवली होती. मात्र रोपे फुकट मिळत असल्याचा मेसेज सोशल मीडिया वर आल्याने परीसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. त्याचवेळी रोपे पळविण्याचा प्रकार शुक्रवारी घडला. शहरात दिवसभर याची चर्चा केली जात होती.