Home Cities अमळनेर “शंभर टक्के पुनर्वसन झालेच पाहिजे!”: आ.अनिल पाटलांच्या निवासस्थानी ग्रामस्थांचा घेराव !

“शंभर टक्के पुनर्वसन झालेच पाहिजे!”: आ.अनिल पाटलांच्या निवासस्थानी ग्रामस्थांचा घेराव !


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तापी, बोरी आणि अनेर नद्यांच्या संगमावर वसलेल्या बोहरा गावातील ग्रामस्थांनी निम्न तापी प्रकल्पांतर्गत १०० टक्के पुनर्वसन व्हावे या प्रमुख मागणीसाठी आज, बुधवारी, १६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता जोरदार मोर्चा काढला. संतप्त ग्रामस्थांनी सुरुवातीला प्रांत कार्यालयावर धडक दिली आणि त्यानंतर थेट माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी मोर्चा वळवला. “शंभर टक्के पुनर्वसन झालेच पाहिजे!” या घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला होता.

गेल्या अनेक वर्षांपासून बोहरा गावातील पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. निम्न तापी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या या गावातील नागरिकांना अद्याप पूर्णपणे न्याय मिळाला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याच अन्यायाविरोधात आणि आपल्या हक्कांसाठी बुधवारी १२ वाजता बोहरा गावकऱ्यांनी एकत्र येत तीव्र आंदोलन छेडले.

ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन उपविभागीय अधिकारी आणि आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी सादर केले. यावेळी त्यांनी आपल्या व्यथा आणि समस्या मांडत, प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन पुनर्वसनाची प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी केली.

या आंदोलनाविषयी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील (अमळनेर) यांनी पुनर्वसन बाधितांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. जोपर्यंत १०० टक्के पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत आपला लढा सुरूच राहील, असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला.


Protected Content

Play sound