जळगाव, प्रतिनिधी | आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पतळ्यासमोर जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली व शहर उपाध्यक्ष श्याम तायडे, प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर कोळी, युवक प्रदेश सरचिटणीस बाबा देशमुख, तालुका अध्यक्ष मनोज चौधरी यांच्या उपस्थितीत भाजपाच्या ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांच्या पोस्टरला ‘जोडे मारो’ आंदोलन करून दहन करण्यात आले.
भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनात पंतप्रधान मोदी यांची रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेवाद्वितीय आहेत. त्यांच्याशी तुलना होऊ शकणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही आणि घेणारही नाही. परंतु मोदी सरकार नेहमीच जाती जाती मध्ये व धर्मा-धर्मांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे काम देशात करीत आहे. अशा प्रकारच्या प्रवृत्ती व व्यक्तींवर देशबंदी करण्यात यावी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर सत्तेत येवून सत्तेवर आलेल्या भाजपाकडून या आधी सुद्धा असाच खोडसाळपणा करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचाच पुढचा भाग म्हणजे हे पुस्तक. प्रत्यक्षात व्यक्तीगत राजकीय स्वार्थासाठी सीएए आणि एनआरसी च्या माध्यमातून देशाला वेठीस धरणारे, धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम भाजप पक्ष करीत आहे. हुकूमशाही व दंगलखोर मोदींची कोणत्याच अर्थाने महाराजांसोबत तुलना होवू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केले. मात्र नरेंद्र मोदी जाती धर्मात द्वेष निर्माण करण्याचे काम करीत आहे. भाजपाच्या या खोडसाळपणाचा जळगाव जिल्हा एन.एस.यु.आय., युवक काँग्रेस, शहर व तालुका काँग्रेस, अनु.जाती व जमाती काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध व या पुस्तक तत्काळ रद्द करण्यात यावे अन्यथा पुस्तकाची माघार जाहीर करावी व भाजप राष्ट्रीय अध्यक्ष यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी अनु.जाती जमाती जिल्हाध्यक्ष मनोज सोनवणे, युवक शहराध्यक्ष मुजीब पटेल, जिल्हा सरचिटणीस जमील शेख, शोएब पटेल, नदीम काझी, उद्धव वाणी, पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.