जळगाव, प्रतिनिधी | प्रल्हाद सुकदेव पाटील, श्रावण दगडू पाटील, कैलास मुरलीधर पाटील, मंगल सुभाष जाधव, नामदेव माळी आदींच्या जामनेर तालुक्यातील कोल्हे गावातील जमिनी शासनाने संपादीत केलेल्या आहेत. याबाबत न्यायालयाने देखील १० फेब्रुवारी २०१८ रोजी निकाल देऊनही आज पर्यत कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे, विशेष भूसंपादन अधिकारी यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.
लघु पाटबंधारे विभागाकडे वारंवार पैशाची मागणी करून देखील त्यांना मोबदला देण्यात आलेला नाही. त्याच्या जमिनी बऱ्याच वर्षापासून संपादित करण्यात आलेल्या आहेत. यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. न्यायालयाने निकाल देऊनही तसेच जलसंपदा विभागाला अनेक अर्ज देऊनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने त्यांनी जामनेर तहसिल कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणाला बसले देखील न्याय न मिळाल्याने आता मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे. तेथेही न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देखील दिला आहे.