फैजपूर, प्रतिनिधी | कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष ना.हरीभाऊ जावळे यांनी नुकतीच (दि.२) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयाबद्दल मुख्यमंत्री यांचे अभिनंदन केले आणि पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या तर चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या यशाबद्दल व त्यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघात मिळवलेल्या विजयाबद्दलही त्यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
रावेर विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या वतीने भारतीय जनता पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील यांचे व भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यकारिणीचे त्यांनी धन्यवाद व्यक्त केले. सोबतच रावेर विधानसभा क्षेत्र मी निवडून आणू शकलो नाही, ह्याची जबाबदारी स्वीकारून हरीभाऊ जावळे यांनी खंतही व्यक्त केली.
सोबतच आज जेव्हा अवघ्या महाराष्ट्रातील शेतकरी हा अवकाळी पावसाने त्रस्त झाला आहे, हातात आलेले सर्व पीक या पावसामुळे वाया गेले आहे. अश्या संकटकाळी शेतकऱ्यांना खरीप हंगामाची नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी, जेणेकरून बळीराजाला रब्बी हंगामात त्याची मदत होईल. यासंदर्भातही त्यांनी मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चाही केली.