चाळीसगाव प्रतिनिधी । त्रस्त शेतकर्यांचे सुरू असलेले आंदोलनास आज नऊ दिवस होत असून राज्य सरकार अद्यापही न्याय देण्यास उशीर करत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कठोर पवित्रा घेत आंदोलनाचे स्वरूप तीव्र केले आहे.
तालुक्यातील बोढरे-शिवापूर शिवारातील सोलर फार्मस प्रा. लि. व जेबीएम सोलर म. प्रा. लि या बेकायदा सोलर कंपनीने कवडीमोल भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी गेल्या चार वर्षांपासून पिडीत शेतकऱ्यांकडून लढा सुरू आहे. मात्र महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असल्याने आतातरी निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने लागेल या आशेच्या किरणावर मोजक्या शेतकऱ्यांसह शेतकरी बचाव कृती समितीने मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन २१ सप्टेंबर पासून सुरू आहेत.
मात्र आंदोलनाला नऊ दिवस उलटूनही न्याय अद्याप शेतकऱ्यांच्या बाजूने दिला जात नसल्याने पिडीत शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार जोपर्यंत एस.आय.टी चौकशीचे आदेश देत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे शेतकरी बचाव कृती समितीने सचिव भिमराव जाधव यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्युजशी बोलताना सांगितले.
या आंदोलनाप्रसंगी कार्याध्यक्ष किशोर सोनवणे, अध्यक्ष भरत चव्हाण , सचिव भिमराव जाधव व पिडीत शेतकरी, एकनाथ राठोड, चुनिलाल राठोड, सोमा चव्हाण, लक्ष्मण राठोड, देविदास राठोड, कन्हीराम जाधव, आदी उपस्थित होते.