धरणगाव, प्रतिनिधी | मी नगराध्यक्ष झालो तर पारदर्शकता आणि गतिमानता या दोघांचा वापर करून पालिकेत सुशासन आणण्याचा प्रयत्न करेन, असा विश्वास शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचे उमेदवार निलेश सुरेश चौधरी यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना व्यक्त केला.
ते यावेळी पुढे म्हणाले की, स्व.सलीम पटेल यांनी शहराच्या विकासाचा उंचावलेला आलेख मी अधिक उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. त्यासाठी सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची मदत घेईन. जनतेच्या तक्रारींचा त्वरित निपटारा व्हावा, समस्याग्रस्तांना सुविधा मिळावी, म्हणून पालिकेच्या कारभारात गतिमानता आणून प्रशासन आणि जनता यांचा थेट संवाद घडवण्याचा प्रयत्न करेन. पालिकेतील अधिकारी व कर्मचार्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कार्यशाळा घेवून प्रशिक्षण दिले जाईल, पालिकेत सुशासनासाठी माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला जाईल, पालिकेच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर दिला जाईल, असेही ते म्हणाले.
नगराध्यक्षपद मिळाले तर ते माझ्यासाठी एक मोठे आव्हान असेल. त्यामुळेच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आरोग्य व स्वच्छतेसह रोजगार निर्मितीवर मी भर देईन, अशी ठाम भूमिका निलेश चौधरी यांनी यावेळी स्प्ष्ट केली.