जळगाव, प्रतिनिधी | राज्यात रा.कॉ.तर्फे महिलांचे आरोग्य व संरक्षणासाठी १२ कलमी कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. सध्याच्या सरकारचे महिलांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष झालेले आहे. असे प्रतिपादन महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज येथे पत्रकारांशी संवाद साधताना केले.
त्या पुढे म्हणाल्या की, राज्य सरकारने यात्रा काढून फोडाफोडीचे राजकारण करण्यापेक्षा महिलांच्या संरक्षणाकडे लक्ष द्यावे. आता महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस महिलांच्या संरक्षणासाठी निर्भया पथकाच्या धर्तीवर उपाययोजना करणार असून त्यात मदतीसाठी टोल-फ्री नंबर दिला जाईल. समाजात व कुटुंबात अत्याचारांना बळी पडणाऱ्या महिलांना त्यातून मदत दिली जाईल. महिलांचा विकास करण्यासाठी शिक्षण, उच्च शिक्षण व व्यवसाय अशा क्रमाने त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. आमच्याकडे यंत्रणा आणि सक्षम नेतृत्व आणि कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आम्ही जनतेला फक्त आश्वासने न देता, बोलल्याप्रमाणे काम करून दाखवू, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.