चेन्नई (वृत्तसंस्था) ‘महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता,’ असे विधान दाक्षिणात्य सुपरस्टार आणि मक्कल निधी मियाम या पक्षाचे प्रमुख कमल हासन यांनी केले आहे. दरम्यान.अगोदरच देशभरातील लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू दहशतवादाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापलेले असताना, कमल हसन यांच्या या विधानाने नवा वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चेन्नईतील अरिवाकुरुची विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना कमल हासन यांनी हे वक्तव्य केले आहे. या ठिकाणी १९ मे रोजी मतदान पार पडणार आहे. यावेळी हसन यांनी हे देखील सांगितले की, नथुराम गोडसे हा महात्मा गांधी यांची हत्या करणारा स्वतंत्र भारतातील पहिला अतिरेकी होता आणि तो हिंदू होता. इथं मुसलमानांची लोकसंख्या अधिक आहे म्हणून मी हे बोलत नाही. तर महात्मा गांधीच्या पुतळ्याखाली उभा असल्याने मी हे बोलत आहे, असे हासन म्हणाले. याप्रसंगी त्यांच्या पक्षाचे उमेदवार एस.मोहनराज यांची देखील उपस्थिती होती.
विविधता आणि समानतेने नटलेल्या भारताबाबतचे आपले मत व्यक्त करताना हसन म्हणाले की, सर्व भारतीयांची आपल्या राष्ट्रीय ध्वजातील तिन्ही रंग जसे आहे तसे कायम ठेवण्याची मनापासून इच्छा आहे. मी एक सच्चा भारतीय आहे आणि मी हे छातीवर हात ठेवून अभिमानाने सांगू शकतो. गांधीजींची हत्या झाली. त्याचा न्याय मागण्यासाठी मी इथे आलो आहे. मी सच्चा भारतीय आहे आणि देशात शांतता आणि समानता प्रस्थापित व्हावी हे कोणत्याही भारतीयाला वाटते, असेही ते म्हणाले.