दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भिती

मुंबई प्रतिनिधी | मुसळधार पावसामुळे चेंबूरमध्ये दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबई आणि उपनगरांतील अनेक भागांत विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. फोर्ट परिसर, कल्याण, भांडूप, अंधेरी, बोरिवली, कांदिवली या परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. ठाणे आणि रायगडमध्येही मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याची माहिती आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील हिंदमाता आणि अन्य सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात कोसळलेल्या तुफान पावसामुळे अनेक परिसर जलमय झाले होतो. रात्रभर कोसळल्यानंतर सकाळच्या सुमारास पावसानं काहीशी विश्रांती घेतल्यानंतर काही भागांमधून पाणी ओसरायला सुरुवात झाली. या पावसामुळे दहिसर नदीचं पाणी बोरीवली पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणावर साचलं होतं. ते देखील ओसरू लागलं आहे. अजूनही मुंबईच्या काही भागांमध्ये पाणी साचलेलं असून मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा रेल्वेच्या वाहतुकीवर पावसाचा परिणाम झाला आहे.

दरम्यान, चेंबूर परिसरात मध्यारात्रीनंतर दरड कोसळल्याने अकरा जण मृत्यूमुखी पडले आहेत. ही दरड खाली असलेल्या घरांवर कोसळल्याने ही दुर्घटना घडली. दरम्यान याची माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकाने तात्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. तर, येथे ढिगार्‍याखाली काही जण अजून अडकून पडले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे.

Protected Content