अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पंधरा दिवसांपूर्वी घेतलेले उसवे पैसे परत देण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून, अमळनेर शहरातील ताडेपुरा भागात एका २७ वर्षीय तरुणावर चार जणांनी मिळून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रोहित भरत फतरोड (वय २७, रा. फकिरवाडा, ताडेपुरा) यांनी १५ दिवसांपूर्वी संशयित आरोपींकडून ५ हजार रुपये उसने घेतले होते. हे पैसे परत करण्यास थोडा उशीर झाल्याचा राग मनात धरून रविवारी १५ फेब्रुवारी रोजी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास आरोपींनी रोहित यांना त्यांच्या घरासमोर गाठले.

यावेळी संशयित आरोपी विक्की मंगल सपकाळे, राज जिभाऊ वाघ, गुडड्या रमेश वाघ आणि अनिल अरुण वाघ (सर्व रा. भिमवाडा, ताडेपुरा) यांनी रोहित यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर गंभीर हाणामारीत झाले आणि आरोपींनी लाकडी काठी व धारदार शस्त्राने रोहित यांच्या डोक्यावर वार केला. एकाने लोखंडी रॉडने रोहित यांच्या उजव्या पायाच्या टाचेवर जबर प्रहार केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक सिध्दांत सिसोदे हे करीत आहे.



