विद्यापीठात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त कार्यक्रम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जाती धर्माच्या बजबजपुरीत माणुस हरवत चालला असून अशा परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या तरूण पिढीने समाजासाठी शिक्षणाचा उपयोग करावा आणि फुले – आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवावी असे आवाहन सुप्रसिध्द कवी नितीन चंदनशिवे यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुरू असलेल्या महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. प्र-कुलगुरु प्रा.एस.टी. इंगळे होते. यावेळी मंचावर व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, डॉ. पवित्रा पाटील, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, प्रा.म.सु.पगारे समितीचे समन्वयक प्रा. आर.जे. रामटेके, मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विकास बिऱ्हाडे उपस्थित होते.

नितीन चंदनशिवे यांचे ‘आजची तरूण पिढी आणि समाजवास्तव’ या विषयावर मांडणी केली. ते म्हणाले की, बहुजन समाजाच्या आयुष्यात १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने सुर्य उगवला. बहुजन समाजातील मुले मोठ्या पदावर गेली पाहिजे. केवळ डी.जे. तालावर नाचून नव्हे तर बाबासाहेब वाचून समाजापर्यंत पोहचविण्याची गरज आहे. शिक्षण घेवूनही माणूस माणसासारखा वागत नाही. सोशल मिडीयावर अधिक कट्टरपणे वागत आहे. कोणतीही कट्टरता ही धोक्याची असते. मानवतेवरील निष्ठा कायम ठेवून काम करा आणि समतेचा आवाज बुलंद करा अशी अपेक्षा व्यक्त करतांना चंदनशिवे यांनी आपल्या विविध कविता देखील सादर केल्या.

अध्यक्षीय समारोपात प्रा.एस.टी. इंगळे यांनी अशा महोत्सवातून वैचारीक जडण घडण होण्यास मदत होते. असे मत व्यक्त केले. राजेंद्र नन्नवरे यांन आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परराष्ट्र धोरणावर प्रकाश टाकला. प्रारंभी या महोत्सव समितीचे समन्वयक प्रा. रामटेके यांनी प्रास्ताविक केले. अभय मनसरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. विजय घोरपडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. अधिष्ठाता डॉ. अनिल डोंगरे यांनी आभार मानले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्‍त विद्यापीठात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रचंड जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारा पासून सुरू झालेल्या या मिरवणूकीचा प्रशासकीय इमारतीजवळ समारोप झाला. यावेळी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, प्रा.म.सु.पगारे, प्रा.जे.बी.नाईक, सीए रवींद्र पाटील, प्रा.राकेश रामटेके, प्रा. किशोर पवार, प्रा.रमेश सरदार, प्रा. विशाल पराते, सुरेखा पाटील, डॉ. अजय सुरवाडे, राजू सोनवणे, अरुण सपकाळे, जयंत सोनवणे, भीमराव तायडे, महेश पाटील, सुभाष पवार, अशोक पाटील आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Protected Content