बस चालकाला मारहाण करून खून केल्याप्रकरणी पाच आरोपींना जन्मठेप

court

court

भुसावळ प्रतिनिधी । बस चालकास बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी आज येथील न्यायालयाने पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत वृत्त असे की, १२ जून २०११ रोजी प्रकाश नारायण म्हस्के हे चालक एमएच४० एन८७९२ या क्रमांकाची बस भुसावळकडून वरणगावकडे जात असतांना फुलगावजवळ त्यांनी एका ट्रॅक्टरला ओव्हरटेक केले. याचा राग आल्याने या ट्रॅक्टरवरील पाचही जणांनी बसचा पाठलाग करून वरणगाव येथील देशमुख पेट्रोल पंपासमोर बस थांबवली. यानंतर समाधान भास्कर कोळी (रा. अंजनसोंडे), प्रमोद किसन इंगळे, सुरेश देवराम पाटील, संदीप उर्फ मनू रामा इंगळे (रा ओझरखेडा) आणि जयेश सारंगधर उर्फ पंडित पाटील (रा. साकेगाव) यांनी प्रकाश म्हस्के यांना बेदम मारहाण केली होती. यानंतर उपचार घेत असतांना त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी वरणगाव पोलीस स्थानकात संबंधीत बसचा वाहक वैभव माणिकराव शिरसाठ ( रा. चिखली, जिल्हा बुलढाणा) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी भुसावळ येथील न्यायालयात खटला सुरू होता. यामध्ये आज न्यायमूर्ती सित्रे यांनी पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड. प्रवीण भोंबे यांनी काम पाहिले.

Add Comment

Protected Content