जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक राजेंद्र रमेश कुलकर्णी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले. कुलकर्णी यांनी शेतजमिनीच्या मोजणीच्या कामासाठी एका शेतकऱ्याकडून ४ हजार रुपयांची लाच मागितली होती. या घटनेमुळे भूमी अभिलेख कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
तक्रारदार (वय ३०) आणि त्यांचे काका यांची मस्कावद, ता. रावेर येथे सामाईक शेतजमीन आहे. या जमिनीच्या मोजणीसाठी त्यांनी ७ जानेवारी २०२५ रोजी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज करून शासकीय शुल्क भरले होते. त्यानंतर, १८ फेब्रुवारी रोजी भूकरमापक राजेंद्र कुलकर्णी यांनी शेतात जाऊन जमिनीची मोजणी केली. मोजणीच्या खुणा दाखवण्यासाठी कुलकर्णी यांनी तक्रारदाराकडे ५ हजार ५०० रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने पैसे नसल्याचे सांगितल्यावर कुलकर्णी यांनी पैशांऐवजी शेतातील हरभरा देण्याची मागणी केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
तक्रारदाराने ४ मार्च २०२५ रोजी लाप्रवि, जळगाव येथे याबाबत तक्रार दाखल केली. पथकाने तक्रारीची पडताळणी केली असता, कुलकर्णी यांनी तक्रारदाराकडे ४ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. २६ मार्च रोजी लाप्रविने निंभोरा येथे सापळा रचून कुलकर्णी यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.
भूकरमापकाची लाचखोरी, शेतकऱ्यांची लूट
या घटनेमुळे भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शेतजमिनीच्या मोजणीसाठी शेतकऱ्यांना शासकीय शुल्क भरूनही लाच द्यावी लागत असल्याचे चित्र या घटनेमुळे समोर आले आहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.