जमीन गैरव्यवहार : धनंजय मुंडेंना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

dhananjay munde

नवी दिल्ली प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना दिलासा देणारी माहिती राजधानी दिल्लीतून आली आहे. बेलखंडी मठ जमीन गैरव्यवहार म्हणजेच जगमित्र साखर कारखाना घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाने 2 आठवड्यांचा दिलासा दिला आहे. पुढील सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. औरंगाबाद खंडपीठाच्या या आदेशावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणली होती. शिवाय, सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावून याप्रकरणी उत्तर मागितले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी 21 ऑक्टोबर म्हणजे आज मतदानाच्या दिवशी ठेवली होती. मात्र आता ही सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या तिकीटावर धनंजय मुंडे पुन्हा एकदा परळी मतदारसंघातून निवडणुकांच्या मैदानात उतरले आहेत. बहीण आणि भाजपच्या विद्यमान आमदार पंकजा मुंडे यांच्याविरोधात ते उभे आहेत. त्यामुळे एकीकडे राजकीय भवितव्य मतपेटीत बंदिस्त होत असतानाच जगमित्र साखर कारखान्याच्या जमीन घोटाळा झाल्याच्या आरोपातही त्यांचा निकाल येण्याची चिन्ह होती. यामुळे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर धनंजय मुंडेंच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर झाली आहे.

जगमित्र साखर कारखाना प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातील पूस या गावात जगमित्र सहकारी साखर कारखाना प्रस्तावित होता. हा साखर कारखाना सुरु करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी 2006 ते 2010 या कालावधीत शेकडो एकर जमीन विकत घेतली त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून तब्बल 25 कोटी रुपयांचं भागभांडवलही उभं केलं. मात्र कारखाना काही सुरु झाला नाही. या प्रक्रियेत धनंजय मुंडे यांनी पूस या गावात असलेल्या बेलखंडी मठाची 25 एकर जमीनही विकत घेतली. ही जमीन बेलखंडी मठाला इनाम दिलेली. जमीन होती आणि त्याचा विक्री व्यवहार होऊ शकत नव्हता याची माहिती असतानाही बेकायदेशीर पद्धतीने ही जमीन विकत घेण्यात आली आणि धनंजय मुंडे अडचणीत सापडले.

Protected Content