एरंडोल (प्रतिनिधी ) शहराची पाण्याची समस्या दुर करणाऱ्या तातडीच्या लमांजन पाणी पुरवठा योजनेचे काम पुर्ण झाले असून सोमवार (ता.१३) पर्यंत शहरात सुरळीत पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. लमांजन पाणी पुरवठा योजनेचे काम पुर्ण झाल्यामुळे शहरातील पाण्याची समस्या दुर होणार असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
शहरात अंजनी प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे प्रकल्पात पुरेशा प्रमाणावर जलसाठा होऊ शकला नाही. त्यामुळे शहरात डिसेंबर महिन्यापासूनच पाण्याची समस्या निर्माण झाली होती. सद्यस्थितीत शहरात अंजनी प्रकल्पातून व स्मशानभूमीत असलेल्या विहिरीतून दहा दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत असल्यामुळे नागरिकांना विशेषता: महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. शहरात निर्माण झालेली पाण्याची समस्या लक्षात घेवून पालिका प्रशासनाने साडे आठ कोटी रुपये खर्चाची लमांजन पाणी पुरवठा शासनाकडे सादर केली होती. शासनाने सदरच्या पाणी योजनेस त्वरित मंजुरी दिली. पालिका प्रशासनाने या योजनेचे काम पुर्ण व्हावे यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न केले.आज या योजनेचे काम पुर्ण झाले असून पाणी पुरवठ्याची चाचणी देखील घेण्यात आली. चाचणी दरम्यान काही किरकोळ प्रकारची गळती पाईप लाईनमध्ये आढळून आल्यामुळे गळती रोखण्याचे काम पालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. किरकोळ प्रकारचे काम पुर्ण झाल्यानंतर सोमवारपासुन शहरात नवीन पाणी पुरवठा योजनेतील लमांजन येथील बंधाऱ्यातून शहरात पाणी पुरवठा करण्यात येईल असे पालिका कार्यालयातून सांगण्यात आले.