
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहराजवळील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) नवीन वाहन फिटनेस टेस्टिंग ट्रॅक आणि कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स चाचणी ट्रॅकवर नागरिकांना भेडसावत असलेल्या गंभीर समस्यांकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लक्ष वेधले आहे. या ठिकाणी पिण्याचे पाणी, सावलीची व्यवस्था आणि स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने नागरिकांना तीव्र उन्हात मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचा आरोप मनसेने केला असून यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

जळगाव शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या या ट्रॅकवर दररोज जिल्हाभरातून शेकडो वाहन चालक, वाहनमालक आणि नागरिक विविध कामांसाठी येत असतात. वाहन फिटनेस तपासणी तसेच कायमस्वरूपी वाहन परवाना चाचणीसाठी येथे नागरिकांची मोठी गर्दी होत असते. मात्र या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना अत्यंत कठीण परिस्थितीत तासन्तास थांबावे लागत असल्याचे मनसेने निवेदनात नमूद केले आहे.
सध्या जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून उष्णतेची लाट जाणवत आहे. अशा परिस्थितीत ट्रॅकवर येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. शहरापासून लांब असलेल्या या ठिकाणी पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
याशिवाय चाचणीसाठी प्रतीक्षा करणाऱ्या वाहन चालक आणि नागरिकांसाठी सावलीत बसण्याची कोणतीही शेड उपलब्ध नसल्याने कडक उन्हात तासनतास उभे राहण्याची वेळ येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहांची योग्य व्यवस्था नसल्यानेही मोठी गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ट्रॅक शहरापासून दूर असल्याने आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदतीसाठी शहराकडे धाव घ्यावी लागते. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. कडक उन्हामुळे एखाद्या नागरिकाला उष्माघाताचा त्रास झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आरटीओ प्रशासनावर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाकडे ट्रॅकवर त्वरित पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची, नागरिकांसाठी प्रशस्त व सावलीची शेड उभारण्याची तसेच तातडीने फिरते किंवा कायमस्वरूपी स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या मागण्यांची पूर्तता येत्या आठ दिवसांत करण्यात यावी, अन्यथा मनसे आपल्या शैलीत तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या वेळी मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, उप महानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, खुशाल ठाकूर, युसुफ खाटीक, अश्फाक शहा, अली खाटीक यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.



