कठुआ, वृत्तसंस्था | जम्मू-काश्मीरचा प्रश्न आता लवकरच सुटेल, जगातील कोणतीही ताकद आता आम्हाला रोखू शकत नाही, असे सांगतानाच चर्चेतून प्रश्न नाही सुटला तर तो कसा सोडवायचा, हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज (दि.२०) येथे दिला. ते जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आले होते.
दहशतवाद प्रश्नी ज्या पद्धतीने संपूर्ण इंटरनॅशनल कम्युनिटी एकत्र येत आहे, त्यामुळे काश्मीरसह संपूर्ण जगाला दहशतवादापासून मुक्ती मिळू शकते, असेही राजनाथ सिंह म्हणाले. ‘काश्मीर खोऱ्यातील सर्व समस्यांचे निराकरण लवकरच केले जाईल,’ असे आश्वासनही त्यांनी दिले. फुटिरतावादी आणि आंदोलकांबाबत सिंह म्हणाले की, ‘काश्मीरमध्ये जे लोक आंदोलन करत आहेत, त्यांना मी आवाहन करतो, त्यांनी चर्चेसाठी समोर यावे. आधी प्रश्न काय आहे, ते निश्चित करा, त्यानंतर ती सोडवण्यासाठी प्रयत्न करावे.’
दरम्यान, राजनाथसिंह यांनी जम्मू-काश्मीरमधील द्रास सेक्टरमधील कारगिल युद्ध स्मारकाला भेट देऊन, हुतात्मा जवांनाच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी ‘वीर भूमी’लाही भेट दिली. सीमा रस्ते संघटनेच्या वतीने कठूआमधील उंज आणि सांबा जिल्ह्यातील बसन्तर येथे बांधण्यात आलेल्या दोन पुलांचे लोकार्पणही सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, लष्कर प्रमुख बिपीन रावत आणि उत्तर मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यावेळी उपस्थित होते, अशी माहिती लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिली.