जळगाव प्रतिनिधी । जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ व पोलीस अधिक्षक कार्यालय यांचे संयुक्त विद्यमानाने अटकपुर्व अधिकार, अटक झाल्यावर अधिकार व न्यायालयासमोर हजर केल्यावर असलेले अधिकार तसेच आरोपीस असलेला विधी सेवेचा अधिकार या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यांत आलेले होते.
सदर कार्यशाळेस जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमुख जी.ए. सानप, पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष पंढरीनाथ चौधरी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.एच. ठोंबरे हे उपस्थित होते.
कार्यशाळेदरम्यान न्यायमुर्ती सानप यांनी यांनी नागरीकांचे हक्क व अधिकारांचे व आरोपींचे हक्क व अधिकारांचे संरक्षण होईल यादृष्टीने सर्वांनी कार्यतत्परतेने काम केले पाहीजे, असे मार्गदर्शने केले. पोलीस अधिक्षक उगले यांनी कायदयाच्या चाकोटीत राहुन नागरीकांना त्यांच्या हक्क व अधिकारांची जाणिव करुन देवुन शिस्तबध्द पध्दतीने काम केले पाहीजे असे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी अटकपुर्व अधिकार या विषयावर सहायक सरकारी अभियोक्ता अँड.एस.जी. काबरा, आरोपींचे अटक झाल्यावर अधिकार या विषयावर सहायक सरकारी अभियोक्ता ए.एल.वाणी, आरोपींचे रिमांड वेळी असलेले अधिकारी या विषयावर एस.आर. चोरडीया यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा होता की, नागरिकांना अटक होण्यापुर्वी व अटक झाल्यानंतर व रिमांडचे वेळी नागरीकांना संविधानाने दिलेल्या हक्काबाबत माहिती व्हावी. या कार्यक्रमादरम्यान जिल्हयातील ३५ पोलीस ठाण्यांमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत अटकपुर्व व अटकेदरम्यान असलेले अधिकाराबाबत बॅनर व माहिती पत्रकाचे वितरण करण्यात येवून हे सर्व बॅनर्स पोलीस ठाणेमध्ये दर्शनी भागात लावण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत करण्यात येत आहे.