मुर्तीजापूर जवळच्या अपघातात जळगावच्या महिलेचा मृत्यू : पती गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुर्तीजापूर जवळील राष्ट्रीय महामार्गावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ भरधाव कार रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॅकरला जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. मयतात जळगाव येथील महिलेचा समावेश आहे. याबाबत माना पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

अल्पना पराग लिमये वय ५६ यांचा मृत्यू झाला तर त्यांचे पती पराग नागेश लिमये वय ५७ हे गंभीर जखमी झाले आहे. दोन्ही जळगाव येथील रहिवाशी आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, लिमये दाम्पत्य हे अमरावती येथून रविवारी १६ मार्च रोजी दुपारी काम आटवून जळगावकडे परत जात होते. दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील कुरूमनजवळील रस्त्यावर झाडांना पाणी देण्यासाठी उभे असलेल्या ट्रॅक्टरचे टँकरला कार क्रमांक (एमएच १९ बीजे ३९४१) ने जोरदार धडक दिली. या अपघातात अल्पना लिमये यांच्या डोक्याला गंभीर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर पराग लिमये यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने मूर्तीजापुर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर दुखापत असल्याने पराग यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील खाजगी रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. तर घामोरी बुद्रुक येथील ट्रॅक्टर चालक सुनील ठाकरे (वय-४८) याचाही मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच माना पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content