
वर्धा (वृत्तसंस्था) ‘ईव्हीएम’ विरोधात आंदोलन करण्याऐवजी जनतेत जावे. आम्ही ही कामी करू शकलो नाही. भविष्यात ती पूर्ण करू असे सांगितले तरी, जनतेकडून तुम्हाला किमान सहानुभूती मिळेल, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे. वर्धा या ठिकाणी महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘ईव्हीएम’ मशीन मुळे भाजपाचा विजय झाला. ईव्हीएममध्ये घोळ आहे, असे म्हणत गळे काढणाऱ्यांना आणि याविरोधात एकवटणाऱ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. दुष्काळमुक्ती हे आमचे यापुढील ध्येय असेल. महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून गेल्या ५ वर्षांत केलेली कामे जनतेला सांगत आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावर भूमिका घेण्यासाठी एकत्र येणाऱ्या विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे सगळेजण ईव्हीएमला विरोध दर्शवत आहेत.




