मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातही भगवद्गीता, संतसाहित्य या आध्यात्मिक शिक्षणाचा शालेय शिक्षणात समावेश केला जावा, अशी मागमी भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.
या संदर्भात तुषार भोसले म्हणाले की, भगवद्गीता हे जीवन जगण्याचे एक सूत्र आहे. गुजरात सरकारने शालेय शिक्षणात भगवद्गीता शिकवण्याचा घेतलेला निर्णय अगदी उत्तम आहे. त्यामुळं महाराष्ट्र सरकारनंही भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा यासारख्या संतसाहित्याचा समावेश शालेय शिक्षणात केला पाहिजे. जेणेकरुन महाराष्ट्रातील भावी पिढी संस्कारक्षम होईल. त्यांना महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा याचं ज्ञान मिळेल, असं भोसले यांनी म्हटलं आहे.
गुजरात सरकारने राज्यभरातील इयत्ता ६ वी ते १२ वीपर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश केला आहे. सरकारने विधानसभेत जाहीर केले की २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीता शिकवली जाईल. विद्यार्थ्यांना गीतेमधील विचार आणि संस्कार शिकवले जाणार आहेत. तसेच विद्यार्थी शाळेत गीतेमधील निवडक श्लोक नित्यपाठ म्हणून म्हणतील.