
मुंबई (वृत्तसंस्था) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या राज्यातील नेत्यांची महत्वपूर्ण बैठक आज मुंबईत झाली. या बैठकीत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांची समीक्षा तसेच आगामी विधानसभा निवडणूक एकत्रित लढविण्याबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्याबाबत या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे कळते.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण सांगितले की, या बैठकीत प्रारंभी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि आगामी विधानसभा निवडणूक यावरही चर्चा झाली. महाआघाडीच्या पहिल्या बैठकीत आगामी निवडणूक सर्वांनी एकत्र येऊन लढायचे ठरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सांगितले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इव्हीएमबाबत लोकांच्या मनात शंका आहे. दुसरीकडे महाआघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीनेही सहभागी व्हावे. परंतू मनसेला महाआघाडीत घ्यायचे की नाही, याबाबत आज चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते आ. छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील,विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रीय सरचिटणीस खा. सुनिल तटकरे,सपाचे नेते आ. अबू आझमी, युवा स्वाभिमान पक्षाचे आ. रवी राणा, आमदार हसन मुश्रीफ,आ. बाबाजानी दुर्राणी, शेकापचे नेते आ. जयंत पाटील, शेकापचे नेते आ. गणपतराव देशमुख, सीपीआयचे नेते प्रकाश रेड्डी, काँग्रेसचे नेते माजी मंत्री आ. नसीम खान, बविआचे आ. हितेंद्र ठाकूर, विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे आ. शरद रणपिसे, आ. जोगेंद्र कवाडे,गवई गटाचे राजेंद्र गवई, आ. हेमंत टकले,आ. अनिकेत तटकरे आदींसह आघाडीचे नेते उपस्थित होते.