Home प्रशासन तहसील रावेरमध्ये अवैध वाळू वाहतूक अनावर! महसूल विभागाचा धाक संपल्याची चर्चा 

रावेरमध्ये अवैध वाळू वाहतूक अनावर! महसूल विभागाचा धाक संपल्याची चर्चा 


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक दिवसेंदिवस वाढत असून, महसूल विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने वाळू माफियांचे धाडस बळावले आहे. भोकर नदी तसेच खिरवड-बर्डी परिसरातून वाळूचे मोठ्या प्रमाणात उपसणं सुरू असून, ती भरधाव ट्रॅक्टरद्वारे रावेर शहरात आणली जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले. महसूल यंत्रणेची निष्क्रियता आणि रात्रीच्या वेळी वाढलेली ही वाहतूक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.

स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, रात्री बारा ते सकाळी नऊ या वेळेत बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरून वाळू वाहतुकीचा उघडपणे कारोबार सुरू असतो. ट्रॅक्टर, डंपर आणि ट्रॉलीद्वारे अवैध वाळूचा व्यापार बिनधास्तपणे चालत असताना, महसूल विभागाचे अधिकारी मात्र ठोस हालचाल करताना दिसत नाहीत. त्यामुळे या गैरव्यवहाराला जणू मोकळे आमंत्रणच मिळाले आहे.

सध्या तहसीलदार बंडू कापसे आणि निवासी नायब तहसीलदार संजय तायडे रजेवर असल्याने प्रशासनातील शिस्त सैलावली असून, याच संधीचा फायदा वाळू माफियांकडून घेतला जात असल्याचे बोलले जात आहे. महसूल विभागाकडून गस्त किंवा अचानक छापे नसल्याने वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक निर्धोकपणे महामार्गावरून फिरत आहेत. परिणामी, शासनाचे कोट्यवधी रुपयांचे महसूल उत्पन्न थेट गळतीला लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महसूल विभागाकडून एकही मोठी कारवाई न झाल्याने, “महसूल विभागाचा धाक संपला काय?” असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनांनी या संदर्भात प्रशासनाकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. नदीपात्रातून अनियंत्रित वाळू उपसा सुरू राहिल्यास परिसरातील पर्यावरणीय संतुलन धोक्यात येईल, असा इशाराही पर्यावरण कार्यकर्त्यांनी दिला आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून वाळू माफियांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. महसूल विभागाने तातडीने हालचाल न केल्यास, ही समस्या पुढील काळात अधिक गंभीर रूप धारण करण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound