मुंडे आज हयात असते तर माझ्यासारख्यांवर अन्याय झाला नसता – खडसे

khadse e1550572684596

मुक्ताईनगर, वृत्तसंस्था | “गोपीनाथ मुंडे हे आज असते तर माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय झाला नसता,” अशी खंत भाजपचे नाराज नेते एकनाथराव खडसे यांनी आज (दि.११) व्यक्त केली आहे. मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंनी आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी खडसे आज सायंकाळी भगवान गडावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर खडसे आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

 

खडसेंनी यावेळी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावनांना वाट करून दिली. ते पुढे म्हणाले की, मुंडे यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण तर झालीच, शिवाय भाजपमध्येही त्यांच्या जाण्यामुळे कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली. गोपीनाथ मुंडे असते तर… अशा चर्चा देखील आता होत आहे. ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एक आधार वाटत होते. आज ते असते तर कदाचित भाजप आणि सेनेतील युती कायम राहिली असती. भाजपची आज जी अवस्था आहे, त्यापेक्षा निश्चित चांगली अवस्था राहिली असती, अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची भावना आहे. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यांची भूमिका सदैव समन्वयाची असायची, असेही खडसे यावेळी म्हणाले.

गोपीनाथ मुंडे हे नेहमी मार्गदर्शकाच्या भूमिकेत असायचे. कधी कधी ते आपली चूक उदार मनाने मान्य देखील करायचे. हाच त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत. दररोज त्यांचे मार्गदर्शन मिळावे, असे आम्हाला आता वाटते, अशी भावनाही खडसेंनी यावेळी व्यक्त केली.

Protected Content