जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागातील बेघर नागरिकांना स्वतःच्या हक्काचे घर मिळावे, यासाठी जळगाव जिल्हा परिषदेने एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. “ही दिवाळी नवीन घरी” या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीला जिल्ह्यात मोठी गती मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त बेघरांना त्यांच्या नवीन घरात गृहप्रवेश करण्याचा आनंद मिळणार आहे.
या उपक्रमांतर्गत, येत्या ३० सप्टेंबरपर्यंत ज्या ग्रामपंचायती त्यांच्या क्षेत्रातील घरकुलांचे बांधकाम पूर्ण करतील, त्यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. त्यांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल. यामुळे ग्रामपंचायतींमध्ये एक सकारात्मक स्पर्धा निर्माण होईल आणि पंतप्रधान आवास योजनेच्या कामाला अधिक वेग येईल.
जळगाव जिल्ह्यात सध्या पंतप्रधान आवास योजना – ग्रामीण (टप्पा २) अंतर्गत सुमारे ९० हजार घरकुलांचे काम सुरू आहे. जिल्हा परिषद आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे उद्दिष्ट आहे की यापैकी किमान ७५ टक्के घरे दिवाळीपूर्वी पूर्ण व्हावीत.
“ही दिवाळी नवीन घरी” या उपक्रमाचा मुख्य उद्देश गरीब, गरजू आणि जीर्ण घरात राहणाऱ्या कुटुंबांना स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या साहित्याचा आणि कुशल कारागिरांचा वापर करून दर्जेदार, सुरक्षित आणि पक्की घरे बांधून देणे हा आहे. या उपक्रमामुळे शासनाचे बेघरांना घर देण्याचे मूलभूत उद्दिष्ट साधले जाणार आहे. या योजनेमुळे केवळ घरेच नव्हे, तर दिवाळीसारख्या शुभ सणाला गरीब कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या घरात नवीन जीवनाची सुरुवात करण्याची संधी मिळणार आहे. जळगाव जिल्हा परिषदेचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपून खऱ्या अर्थाने गरजूंना विकासाच्या प्रवाहात आणणारा ठरेल, यात शंका नाही.