
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राहुल गांधी यांच्या नागरिकत्त्वाबाबत भाजपा नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली होती. यावर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राहुल गांधी यांना नोटीस पाठविण्यात आली असून येत्या पंधरा दिवसांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

राहुल गांधी हे ब्रिटनचे नागरिक असल्याचा दावा स्वामी यांनी आपल्या पत्रात केला आहे. तर, काँग्रेसने स्वामींच्या आरोपाचे खंडण करत राहुल हे जन्मानेच भारतीय असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यासंदर्भात स्वामींनी गृह मंत्रालयाला दोन वेळा पत्र लिहिले आहे. स्वामींनी २१ सप्टेंबर २०१७ या दिवशी या संदर्भात पहिली तक्रार केली होती. त्या नंतर त्यांनी २९ एप्रिल २०१९ या दिवशी दुसरे पत्र लिहिले. या पत्रात सन २००३ मध्ये ब्रिटनमध्ये बॅकॉप्स लिमिटेड नावाच्या कंपनीचे रजिस्ट्रेशन ब्रिटनमध्ये झाले होते. ५१, साउथगेट स्ट्रीट, विंचेस्टर, हँपशायर SO23 9EH असा या कंपनीचा पत्ता देण्यात आला आहे. तर, राहुल गांधी हे या कंपनीचे संचालक आणि सचिव होते, अशी माहिती स्वामींनी पत्रात दिली आहे. कंपनीने सादर केलेल्या १०/१०/२००५ आणि ३१/१०/२०१६ मधील परताव्यात राहुल गांधी यांची जन्मतारीख १९/०६/१९७० अशी नमूद करण्यात आली असून ते ब्रिटनचे नागरिक असल्याचे नमूद करण्यात आल्याचे स्वामींनी पत्रात लिहिले आहे.
१७ फेब्रुवारी २००९ मध्ये कंपनी बंद करण्याच्या वेळी देखील राहुल हे ब्रिटनचे नागरिक असल्याचा उल्लेख असल्याचे स्वामींनी म्हटले आहे. स्वामींच्या या तक्रारीवरून गृहमंत्रालयाने राहुल यांना १५ दिवसांमध्ये आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारचे संचालक (नागरिकता) बी. सी. जोशी यांनी राहुल यांना ही नोटीस पाठवली आहे. दुसरीकडे राहुल हे जन्मापासून भारताचे नागरिक असून भाजप खासदार सुब्रमण्यन यांचे म्हणणे चुकीचे असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे. दरम्यान,याआधी राहुल गांधी यांनी ब्रिटनचे नागरिकत्व घेतल्याचा दावा करत त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी तक्रार अमेठी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ध्रुव लाल यांचे वकील रवी प्रकाश यांनी रिटर्निंग अधिकाऱ्याकडे केली होती. मात्र, यावेळी राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आला होता.


