महाराष्ट्रात गुंडाराज : खा. संजय राऊतांची टिका

मुंबई-वृत्तसंस्था | महाराष्ट्रात गुंडाराज असून वर्षा बंगला तसेच मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गुन्हेगारांचा वावर वाढला असल्याचा आरोप शिवसेना-उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर भाष्य केले. ते म्हणाले की, वर्षा बंगल्यावर, मंत्रालयात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गुंड टोळ्या येऊन भेटत आहेत. खून, दरोडे , अत्याचार अशा गुन्ह्यांसाठी आत असलेले, जामीनवर बाहेर आलेले हे गुंड आणि त्यांच्या टोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून नक्की काय चर्चा करतात ? असा प्रश्‍न संजय राऊत यांनी उपस्थित केला. तर एक माजी पोलीस अधिकारी या बैठका घेत असल्याचे आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, राऊत पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव एका गुंडाला भेटतात. मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी गुंडांची रांग लागली आहे. कल्याणमध्ये आमदार गोळीबार करत आहेत. आज मी एक फोटो टाकलाय,तसा मी रोज टाकणार आहे असा इशाराही राऊत यांनी दिला.

Protected Content