अमळनेर (प्रतिनिधी) सानेगुरूजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज (दि.११) स्मारक कार्यकर्ते व न.पा.चे कर्मचारी यांनी सानेगुरूजींच्या पुतळ्याला सकाळी ६.०० वाजता अभिवादन केले. सकाळी सफाई काम करणाऱ्या कामगारांच्या वतीने रविंद्र पवार व स्मारक कार्यकर्ते राहुल भोई यांनी गुरूजींच्या पुतळ्याला माल्यार्पण केले.
त्यावेळेस ‘आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही’ हे गीत दर्शना पवार यांनी सादर केले. सानेगुरूजी स्मारक अध्यक्ष प्राचार्य डाँ.अरविंद सराफ यांनी ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ या प्रार्थनेतील धर्म व सत्याचे सार माणसाने माणसासोबत माणुसकीने वागण्यात आहे. असे समजावून सांगितले. सानेगुरूजी स्मारकाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन प्रार्थना केली की, ‘मी जीवनाचा नम्र उपासक आहे, सभोवतालचा सारा संसार
सुखी नि समृद्ध व्हावा, ज्ञान विज्ञान संपन्न नि कलात्मक व्हावा, सामर्थ्य संपन्न नि प्रेममय व्हावा, हीच एक मला तळमळ आहे.’ ‘माझे लिहिणे वा बोलणे, माझे विचार वा माझी प्रार्थना, या एकाच ध्येयासाठी असतात’, ‘हे आम्ही आमच्या जगण्यात रूजवण्याचा प्रयत्न करू तेच सानेगुरूजींना खरे अभिवादन असेल’ यावेळी प्रथमेश कोठावदे, रोहिणी धनगर, सोनाली सोनवणे, गोपाळ नेवे, अरविंद कदम, अनिल बेंडवाळ, अरूण फतराळे, अमोल बिह्राडे, रविंद्र सोनवणे, काशिनाथ लोहरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.