जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जळगाव जिल्ह्यात गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करण्यात आले.
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सामाजिक प्रबोधनासाठी ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने, गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज संघटनेच्या कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम यांनी, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेतील मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. “जांभेकर यांनी सामाजिक सुधारणेसाठी पत्रकारितेचा पाया रचला, तोच वारसा आपण जपला पाहिजे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. संस्थापक महासचिव भगवान सोनार यांनी, जांभेकर यांच्या अष्टपैलू व्यक्तित्वाची आणि त्यांच्या शैक्षणिक कार्याची माहिती दिली. केंद्रीय कार्याध्यक्ष सागर ओतारी यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांसमोरील आव्हाने आणि जांभेकर यांच्या विचारांची आजच्या काळातील सुसंगतता यावर मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष चेतन वाणी यांनी, आचार्य जांभेकर यांनी दाखवलेल्या सत्य आणि निपक्षपाती पत्रकारितेच्या मार्गावर चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे सांगितले.
या प्रसंगी संघटनेचे संस्थापक खजिनदार ललित खरे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष दीपक कुलकर्णी, जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत पाटील, उपाध्यक्ष वसीम खान, जळगाव शहर अध्यक्ष जितेंद्र कोतवाल, प्रसिद्धी प्रमुख विश्वजीत चौधरी, लालचंद अहिरे, सुभाष गोळेसर, विकास चव्हाण, हेमंत शर्मा, मनोज जोगी, किशोर शिंपी, अमोल पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक बळकट करण्यासाठी आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी पत्रकारांनी केला. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील पत्रकार वर्गात एकीची भावना निर्माण झाली असून, आद्य पत्रकारांच्या स्मृतींना उजाळा मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.



