Home राज्य विमान भाडे वाढीवर सरकारची धडाकेबाज कारवाई ; ‘भाडे मर्यादा’ लागू

विमान भाडे वाढीवर सरकारची धडाकेबाज कारवाई ; ‘भाडे मर्यादा’ लागू


नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । इंडिगोच्या उड्डाण रद्दांमुळे निर्माण झालेल्या गोंधळाने देशभरातील विमान सेवा विस्कळित झाली असून प्रवाशांचे मोठे हाल सुरू आहेत. या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही विमान कंपन्यांनी भाडे विक्रमी पातळीवर नेले, ज्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आणि घबराट निर्माण झाली आहे. वाढत्या तक्रारींना आणि अचानक वाढलेल्या भाड्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आक्रमक मोडमध्ये आले असून नागरी उड्डाण मंत्रालयाने कठोर पावले उचलली आहेत.

इंडिगोच्या सातत्याने उड्डाणे रद्द होत असल्याने विमान कंपन्यांनी तिकिटांच्या दरात प्रचंड वाढ केली आहे. मंत्रालयाने तत्काळ हस्तक्षेप करत काही विमान कंपन्यांना गंभीर सूचना दिल्या असून ‘नवीन भाडे मर्यादा’ लागू केल्या आहेत. सर्व विमान कंपन्यांना या मर्यादांचे पालन करणे बंधनकारक असून स्थिती सामान्य होईपर्यंत या नियमांचा अवलंब केला जाणार आहे. प्रवाशांना मनमानी दर आकारले जाऊ नयेत यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

सरकारने भाडे नियंत्रणासोबतच ‘रिअल-टाइम फेअर ट्रॅकिंग’ प्रणाली लागू करण्याची घोषणा केली आहे. या प्रणालीद्वारे तिकिटांच्या किमतींवर सतत लक्ष ठेवण्यात येणार असून कुठलीही कंपनी भाडे नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाईल. मंत्रालयाच्या या कठोर भूमिकेमुळे विमान भाड्यांवर नियंत्रण येऊन प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

इंडिगोचे संकट चिघळत असल्यामुळे विमानभाडे अक्षरशः आकाशाला भिडले आहेत. साधारण ६,००० रुपयांचे दिल्ली-मुंबई भाडे तब्बल ७०,००० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. दिल्ली-पाटणा मार्गावरील भाडे ५,००० रुपयांवरून थेट ६०,००० रुपयांपर्यंत गेले आहे. दिल्ली-बेंगळुरू मार्गाची परिस्थिती तर अधिकच गंभीर असून ७,००० रुपयांचे सरासरी भाडे १ लाख रुपयांहून अधिक झाले आहे. दिल्ली-चेन्नईचे भाडे ९०,००० रुपये तर दिल्ली-कोलकाता मार्गाचे भाडे ६८,००० रुपये झाले आहे. या आकडेवारीतून मनमानी भाडेवाढ किती मोठ्या प्रमाणावर झाली आहे याची स्पष्ट कल्पना मिळते.

दरम्यान, इंडिगोची अडचण सलग पाचव्या दिवशीही कायम आहे. दिल्लीहून निघणाऱ्या ८६ उड्डाणांपैकी ३७ निर्गमन आणि ४९ आगमन उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. मुंबईत तब्बल १०९ उड्डाणे रद्द झाली असून त्यात ५१ आगमन आणि ५८ निर्गमन उड्डाणांचा समावेश आहे. अहमदाबादमध्ये १९ आणि तिरुवनंतपुरममध्ये ६ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. या परिस्थितीमुळे प्रवाशांचे नियोजन विस्कळित होत असून विमानतळांवर प्रचंड गर्दी दिसून येत आहे.


Protected Content

Play sound