जळगाव/नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । उत्तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. अजनी (नागपूर) – पुणे दरम्यान लवकरच सुरु होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला जळगाव स्थानकावर थांबा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल खा. स्मिता उदय वाघ यांनी नवी दिल्ली येथे रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री मा. अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील लाखो नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. जळगावकरांना आता वेगवान, आधुनिक आणि आरामदायक १२ तासात पुणे-नागपूर रेल्वे प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. पुणे आणि नागपूरसारख्या प्रमुख शहरांशी थेट, जलद आणि दर्जेदार रेल्वे कनेक्टिव्हिटी जळगावकरांसाठी सुलभ होणार आहे. खासदार स्मिता वाघ यांनी यापूर्वी रेल्वे मंत्रालयाच्या बैठकीत जळगावसाठी वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची मागणी केली होती. अखेर, त्यांच्या मागणीला यश आले आहे.

येत्या १० ऑगस्ट रोजी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ होणार असून, त्यानंतर ही एक्सप्रेस नियमितपणे जळगाव स्थानकावर थांबेल. या भेटीदरम्यान, खासदार वाघ यांनी जळगाव आणि खान्देश परिसरातील इतर रेल्वे प्रकल्पांबाबतही मंत्र्यांसोबत चर्चा केली. या चर्चेला रेल्वे मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.



