तापी नदीपात्रात बुडून बालिकेचा मृत्यू; मुलगा बचावला

भुसावळ प्रतिनिधी | शहरातील झेडटीसी भागाजवळच्या तापी नदीच्या पात्रात गणपती विसर्जन करण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत गेलेल्या बालिकेचा बुडून मृत्यू झाला असून तिच्या भावाला मात्र वाचवण्यात यश आले आहे.

याबाबत वृत्त असे की, मनीष यादव हे झेडटीसी परिसरात वास्तव्याला आहेत. त्यांच्याकडे श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली होती. दीड दिवसानंतर ते आज सकाळी विसर्जन करण्यासाठी झेडटीसी जवळ असणार्‍या तापी नदीच्या पात्रात आपली पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्यासह गेले होते. यावेळी पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने त्यांची मुलगी अनन्या ही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली. यातच मुलगा आर्यनराज हा देखील पाण्यात उतरल्याने तो देखील बुडू लागली. त्यांनी आरडाओरडा केला असता परिसरातून काही जणांनी घटनास्थळी धाव घेतली.

यात आर्यनराज याला वाचविण्यात यश आले असले तरी अनन्या मनीष यादव ही बालिका मात्र बुडाल्याने यादव परिवार शोकाकुल झाला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अनन्याच्या मृतदेहाचा शोध सुरू होता.

Protected Content