रावेर, प्रतिनिधी | परतीच्या पावसाने रावेर तालुक्यात झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी या मागणीसाठी दि. ८ नोव्हेंबर रोजी फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयावर रावेर व यावल तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. हा निर्णय आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
या बैठकीत आ. शिरीष चौधरी यांनी सांगितले की, अवकाळी, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यासोबतच शेतमजूर हे बेरोजगार झाले आहेत. शेतकऱ्याचे पूर्ण नुकसान झाले असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार खरीपच नव्हे तर पुढील रब्बी हंगाम देखील धोक्यात आला आहे. यासह इतर सर्व गोष्टीवर चर्चा करण्यासाठी व पुढील कृती निश्चित करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी ज्या सूचना आल्या त्यानुसार निवेदन तयार करण्यात येत आहे. हे निवेदन शेतकरी व कामगार बंधूंच्या प्रतिनिधीना सोबत घेऊन शुक्रवार ८ मार्च रोजी प्रचंड मोठा मोर्चा काढून प्रांत अधिकारी यांना देण्यात येणार आहे. शांतपणे मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चाची तातडीने सरकारने दखल घेतली नाही तर मोठे आंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा आ. चौधरी यांनी दिला. चिनावल गावात अतिवृष्टीमुळे केळीच्या पिकांचे नुकसान झाले आहे मात्र सरकार याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला आहे. सरसकट शेतकऱ्यांना प्रती हेक्टर १ लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी पाटील यांनी केली आहे.