वनविभागाचा बुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘निसर्ग अनुभव’; जंगल सफारीत प्राणी गणनेची संधी

जळगाव/यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल वनविभागाच्या वतीने बुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी निसर्गप्रेमींसाठी एक अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘निसर्ग अनुभव’ या विशेष कार्यक्रमांतर्गत वनविभागातर्फे प्राणीगणना केली जाणार असून, यात निसर्गप्रेमींना प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. यावलचे उपवनसंरक्षक श्री. जमीर शेख आणि चोपड्याचे सहाय्यक वनसंरक्षक श्री. प्रथमेश हाडपे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमासाठी चोपडा ते रावेर वनक्षेत्रातील जंगल भागात एकूण ३९ मचाणे उभारण्यात आली आहेत.

प्रत्येक मचानावर एका वेळी तीन ते चार व्यक्ती बसून वन्यजीवांचे निरीक्षण करू शकतील. याकरिता चोपडा वनक्षेत्रात ३, वैजापूर येथे ७, अडावदमध्ये ५, देवझिरी येथे ५, यावल पूर्व भागात ६, यावल पश्चिममध्ये ५ आणि रावेर वनक्षेत्रात सर्वाधिक ८ मचाण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही प्राणीगणना केवळ प्रत्यक्ष निरीक्षणावर आधारित नसून, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. विविध ठिकाणी ट्रॅप कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनही वन्यजीवांच्या हालचाली आणि त्यांची संख्या नोंदवली जाईल. निसर्गाच्या सान्निध्यात वन्यजीवनाचे रहस्य अनुभवण्याची आणि त्यांच्या अभ्यासात सहभागी होण्याची ही संधी निसर्गप्रेमी, वन्यजीव अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी निश्चितच एक अविस्मरणीय अनुभव ठरेल.

या विशेष कार्यक्रमामुळे निसर्गप्रेमींना रात्रीच्या शांत आणि थरारक वातावरणात विविध वन्यजीवांचे दर्शन घेता येणार आहे. या वनक्षेत्रात बिबट, अस्वल, सांबर, तडस, कोल्हा, चितळ, भेकर, चौशिंगा, साळिंदर, नीलगाय आणि रानडुक्कर यांसारख्या अनेक वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. याशिवाय, विविध प्रकारचे आकर्षक पक्षीदेखील या जंगल भागात आढळतात, ज्यांचे निरीक्षण करणे एक आनंददायी अनुभव असेल.

या ‘निसर्ग अनुभव’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी यावल वनविभागामार्फत प्रति व्यक्ती ५००/- रुपये शुल्क आकारले जाणार आहे. या शुल्कात सहभागी व्यक्तींसाठी भोजन आणि आवश्यक सुविधांचा समावेश असेल. इच्छुक निसर्गप्रेमींना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सोप्या पद्धतीने नोंदणी करता यावी, यासाठी एक QR कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कोडच्या साहाय्याने ते आपली नोंदणी निश्चित करू शकतील.

सध्या यावल वनविभागात नैसर्गिक पाणवठ्यांची स्वच्छता आणि दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. वन्यजीवांसाठी पिण्याच्या पाण्याची नवी व्यवस्था केली जात आहे, जेणेकरून त्यांना पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध होईल. यासोबतच, मचाण्यांच्या उभारणीचे कामही अंतिम टप्प्यात असून, लवकरच ते निरीक्षणासाठी सज्ज होतील.

या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन धुळे वनवृत्ताच्या मुख्य वनसंरक्षक (प्रा.) श्रीमती निनू सोमराज, यावलचे उपवनसंरक्षक श्री. जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) श्री. प्रथमेश हाडपे आणि सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) श्री. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. यावल वनविभागातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक आणि वनमजूर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेत आहेत. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित होणारा हा ‘निसर्ग अनुभव’ उपक्रम निश्चितच वन्यजीव संरक्षण आणि पर्यटनाला चालना देणारा ठरेल, असा विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे.

Protected Content