पत्नीच्या जाचाला कंटाळून आईवडीलांसह तरूण बेपत्ता

family missing case

जळगाव प्रतिनिधी । पत्नीच्या जाचाला कंटाळून श्रीधर नगरातील 36 वर्षीय तरूण आपल्या वृध्द आईवडीलांसह घरातून बेपत्ता झाले. याबाबत विवाहितेच्या खबरीवरून रामानंद नगर पोलीसात पतीसह सासू आणि सासरे बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, विवाहिता रूपाली दिपक सोनगीरे (वय-28) रा. श्रीधर नगर, पॉवर हाऊस जवळ ह्या पती दिपक आत्माराम सोनगीरे (वय-36), सासु रजनी आत्माराम सोनगीरे (वय-55), सासरे आत्माराम रामचंद्र सोनगीर (वय-60) अशा कुटुंबासह एकत्र राहतात. राहत्या घरातच ब्यूटी पार्लरचे काम करतात. पती दिपक हे एमआयडीस कंपनीत कामाला आहे. मावसबहिनीचे धरणगाव येथे 14 मे रोजी लग्न असल्याने विवाहिता 12 मे रोजी दुपारी पिंप्राळा येथील मावशीघ्या घरी गेली. 13 मे रोजी दिपकने मी संध्याकाळी हळदीच्या कार्यक्रमाला परस्पर येतो असे सांगितल्यानंतर त्या कपडे वगैरे घेवून पिंप्राळा येथून धरणगाव येथे निघून गेल्या. त्यावेळी घरी सासू व सासरे हे एकटेच होते. त्यानंतर त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. विवाहितेने वारंवार सर्वांच्या मोबाईलवर संपर्क केला तरी त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

जग सोडून जात असल्याचे लिहून ठेवले डायरीत
दरम्यान लग्न लागेपर्यंत पती आले नाही याची चिंता वाटू लागल्याने विवाहितेने आपल्या वडीलांसह जळगावला आले. घरी आल्यानंतर घराला कुलूप लावलेले होते. कुलूप उघडून पाहिले असता एक डायरी उघड्या स्थितीत ठेवलेली दिसली त्यातील एका पानावर शिष पेन्सीलने, ‘प्रिय रूपालीस, तुझ्या इच्छे प्रमाणे मी आणि माझे आई वडील हे जग सोडुन जात आहोत तुझी इच्छा पुर्ण होवो ही सदिच्छा तुझा आणि फक्त तुझाच दिपक, कृपया आमचा तपास करू नकोस, आम्ही मेलो, तुला सोडुन’, असे लिहिलेली डायरी मिळुन आली. विवाहितेच्या खबरीवरून रामानंद पोलीसात पती, सासू आणि सासरे हरविल्याची नोंद करण्यात आली. याबाबत पुढील तपास विजय निकुंभ करीत आहे.

Add Comment

Protected Content