वाहन चालवतांना विना हेल्मेट व सीटबेल्ट न लावल्यास होणार दंडात्मक कारवाई

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरासह जिल्ह्यात विना हेल्मेट दुचाकी वाहन चालविल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दरम्यान वारंवार त्याच नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाच्या रकमेत वाढ केली जाणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांनी दिली आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यात वारंवार दुचाकी वाहनांसह अन्य वाहनांना होणारे अपघात त्यात होणारी जीवीतहानी पहाता बेशिस्त वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळेच अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. बरेच वेळा वाहनचालक वाहन चालवितांना मोबाईलवर संभाषण करणे, विना हेल्मेट वाहन चालविणे तसेच वेगमर्यादेचे उल्लंघन करणे आदी कारणांमुळे अपघात झाले आहेत. गेल्याच महिन्या दिड महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह मोहिम राबविण्यात आली परंतु यात बरेच दुचाकी वाहनचालक विना हेल्मेट वाहनचालविताना आढळून आले आहे. यात नियमांचे पालन न झाल्यामुळे अपघात झाल्याचेही समोर आले आहे. शासन निर्देशानुसार दुचाकी वाहनचालकांना वाहन चालविते वेळी हेल्मेट तर चारचाकी वाहन चालकांना सिटबेल्ट वापराची सक्ती करण्यात आली आहे. १६ वर्षांच्या आतील व्यक्ती तसेच विना परवाना वाहन चालविणे, विना नोंदणी, वाहनाचा विमा नसणे, फॅन्सी नंबर प्लेट, नो एन्ट्रीमध्ये अथवा विरूद्ध दिशेने वाहन चालविणे, ट्रीपल सीट, वाहनचालकाशेजारी बसणे, ओव्हर सीट, रात्रीच्या वेळी विना लाईटचे वा अंधूक दिवा असणे, वेग मर्यादेचे उल्लंघन करणे, वाहतूक पोलीसांनी शिटी वा थांबण्याचा ईशारा करूनही न थांबणे अशा विविध कारणांसाठी मोटर व्हेइकल ऍक्टअंतर्गत विविध कलमांखाली दंडात्मक कारवाईची अंमलबजावणी केली जाणार आहे.

 

दुचाकी चालकांनी हेल्मेटशिवाय वाहन चालवणार्‍याचा परवाना तीन महिन्यांपर्यंत निलंबित होऊ शकतो. तसेच ऍटो रिक्षा, प्रवासी वाहनांमध्ये वर्षांखालील १२ बालकांना पुरेशी बैठक व्यवस्था देणे सक्तीचे केले आहे. नियमांचा भंग केल्यास ५० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंतचे दंड निर्धारित करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांकडे असलेल्या ऑनलाइन दंडाच्या मशीनमध्ये सर्व नियम व दंड अपडेट करण्यात आले आहेत. त्यामुळे आजपासून वाहन चालवताना नियमांचे पालन करणे सक्तीचे केले आहे. पहिला दंड भरल्यानंतर पुन्हा तीच चूक करणार्‍यास दंडाची रक्कम वाढवण्यात येणार आहे. नियम मोडणार्‍या वाहनांवर सक्तीने कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्रक वाहतूक शाखेने काढले.

 

वाहतुकीचे नवीन नियम राज्यभरात लागू करण्यात आले आहेत. त्या अनुशंगाने आज सोमवार १३ डिसेंबरपासून जिल्ह्यात अंमलबजावणी होणार आहे. वाहनचालक, मालकांनी नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांकडे असलेल्या मशीनमध्ये नवीन नियमांनुसार कायद्याचे उल्लंघन व दंडाची रक्कम नमूद करण्यात आली असल्याचेही शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे यांनी म्हटले आहे.

Protected Content