मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त विधानावर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्टील महाकुंभाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईत आलेल्या फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना यावर भाष्य केलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “गोपीचंद पडळकर यांचं विधान योग्य होतं असं मी मानत नाही. वडिलांबद्दल किंवा कुटुंबाबद्दल बोलणं हे कुठल्याही दृष्टिकोनातून योग्य नाही.”
स्टील महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र देशातील स्टील उत्पादनात सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र, पुढील आठ वर्षांत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रीन स्टीलच्या माध्यमातून महाराष्ट्रात १ लाख रोजगार निर्माण होणार असून, त्यासाठी ५ हजार कोटींचा निधी केंद्र शासनाच्या सहकार्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात ग्रीन स्टील हब उभारण्यात येत असून, त्याचा प्रभाव इतर जिल्ह्यांवरही सकारात्मक दिसून येईल, असं त्यांनी सांगितलं.

पडळकर यांच्या विधानावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “मी गोपीचंद पडळकर यांच्याशी स्वतः बोललो आहे. शरद पवारांनीदेखील मला या संदर्भात फोन केला होता. मी त्यांनाही सांगितलं की, आम्ही अशा प्रकारच्या वक्तव्यांना समर्थन देत नाही.” त्यांनी पुढे सांगितलं की, पडळकर हे तरुण नेते आहेत आणि अनेकदा अॅग्रेशनच्या भरात बोलताना आपले शब्द कसे अर्थ घेतले जातील याचा विचार ते करत नाहीत. त्यामुळे मी त्यांना सल्ला दिला आहे की, “आपण भविष्यात मोठा नेता होऊ शकतो, पण बोलताना शब्दफेक विचारपूर्वकच असावी.”
या संवादात फडणवीसांनी “लाडकी बहीण” योजनेतील बोगस लाभार्थ्यांच्या मुद्द्यावरही भूमिका मांडली. ते म्हणाले की, “गोल्डन डेटा” च्या आधारे राज्यात पारदर्शकतेने योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. बोगस लाभ घेणाऱ्यांविरोधात कारवाई होणार असून, योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.



