पुणे, (विशेष प्रतिनिधी) मुलांच्या मनात चाललेले विचार आणि भावनांचे महाभारत जाणून घ्यायचे असेल तर ‘मुलांच्या मनात डोकावतांना’ ही पुस्तकरुपी गीता प्रत्येक पालकाने व शिक्षकाने वाचायला हवी, असे विचार पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी नुकतेच स्वाती टोकेकर यांच्या ‘मुलांच्या मनात डोकावताना’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी केले.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, मुलांसाठी आवर्जून केलेल्या लेखनाची दखल घेणे आवश्यक आहे, तसेच मुलांच्या मनातील नवनवीन कल्पना, प्रश्न, जिज्ञासा, भावना आणि विचारांचा गोंधळ जाणून घेण्यासाठी आणि आपले मूल समजून घेण्यासाठी हे पुस्तक खरो्खरच अनेक लोकांपर्यंत पोहचले पाहिजे असेही ते आग्रहपूर्वक म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसि्ध्द शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी पुस्तकाची भाषा, यातील प्रसंग, अडचणी जणू लेखिकेने परकायाप्रवेशाप्रमाणे १५ वर्षांचा आदित्य बनून डायरीच्या रुपात या पुस्तकात अतिशय सुगम भाषेत सांगून पालक आणि शिक्षकांना जागे केले आहे. या पुस्तकाच्या लेखिका डॉ. स्वाती गानू टोकेकर यांनी आपल्या मनोगतात शिक्षकाने प्रथम आई व्हायला हवं, तरच शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते फुलत जाते असे सांगितले.
या पुस्तकाचे एकाचवेळी ई-बुक आणि छापील पुस्तक असे दुहेरी प्रकाशन झाले यावेळी व्यासपीठावर प्रा. मिलिंद जोशी, हेरंब कुलकर्णी, वैशाली प्रकाशनचे प्रकाशक विलास पोतदार, कवि रविंद्र मालुंजकर, बुक गंगाच्या प्रतिनिधी म्हणून आसावरी कुलकर्णी आदी उपस्थित होते. प्रख्यात चार्टर्ड अकांऊटंट विनय गानू यांचे पण विशेष सहकार्य या कार्यक्रमाला लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नीला सोनवणे यांनी केले. सदर पुस्तकाची किंमत १६० रुपये असून सदर पुस्तक बुक गंगा डॉट कॉम वर उपलब्ध आहे, असे प्रकाशकांच्या वतीने कळवण्यात आले आहे.