आदर्श आचारसंहितेचे प्रत्येक विभागाने काटेकोरपणे पालन करावे : डॉ अविनाश ढाकणे

avinash dhakne 201812176602

जळगाव (प्रतिक्रिया) भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान, तर २४ ऑक्टोबर २०१९ रोजी मतमोजणी होईल. या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभाग प्रमुखाने सतर्क राहून आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा नियोजन सभागृहात आज सकाळी सर्व विभागप्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ उदय टेकाळे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार, यावलचे पी. पी. मोरणकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले, आदर्श आचारसंहितेचे गांभीर्य प्रत्येकाने समजून घ्यावे. संबंधित विभागांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील राजकीय पक्षांचे बॅनर, होर्डिंग्ज, फलक, पोस्टर तत्काळ काढून विहित वेळेत अहवाल सादर करावेत. माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील माहिती जाणून घ्यावी. आचारसंहितेचा भंग झाल्यास तत्काळ गुन्हे दाखल करावेत. सोशल मीडियाच्या नियंत्रणासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावर स्वतंत्र पथक गठित करण्यात येईल.
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही C- Vigil या मोबाईल ॲपचा वापर केला जाणार आहे. नागरिकांना एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे या ॲपमध्ये छायाचित्र अथवा व्हीडीओ काढून तक्रार नोंदविता येईल. त्याच्यावर १०० मिनिटांत कार्यवाही पूर्ण करावयाची आहे. निवडणूक कामासाठी प्रतिनियुक्त कर्मचाऱ्यांना संबंधित विभागप्रमुखांनी तत्काळ कार्यमुक्त करावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिले. त्याचबरोबर राजकीय पक्षांचे प्रचार कार्यालयास परवानगी देताना वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात उत्पादन शुल्क विभागाने गस्त वाढवावी. जेणेकरुन अवैध दारु विक्री होणार नाही. परिवहन विभागाने प्रचाराच्या वाहनास परवानगी घेतली आहे याची खात्री करावी. मतदान केंद्र व केंद्राचा परिसर स्वच्छ व सर्व सुविधांनी युक्त राहील याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यात कुठेही शासकीय संपत्तीचे विद्रुपीकरण आढळल्यास संबंधितांस जबाबदार धरण्यात येईल. त्याचबरोबर ही निवडणूक प्लॅस्टीकमुक्त करावयाची असल्याने सर्व संबंधितांनी याची काळजी घेऊन या मोहिमेस सहकार्य करावे.

येत्या २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती असल्याने याचे औचित्य साधून जिल्हा प्लॅस्टीकमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या मोहिमेच्या निमित्ताने 2 ऑक्टोबर रोजी सर्व कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयात स्वच्छता मोहिम राबवावी. आपले कार्यालय प्लॅस्टीकमुक्त करावे. जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात प्लॅस्टीक मुक्तीची चांगली मोहिम सुरु असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी वृक्ष लागवड मोहिमेचा आढावा घेतला. जिल्ह्याचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्टपूर्तीसाठी प्रत्येक विभागाला उद्दिष्ट देण्यात आले आहे. संबंधित विभागांनी आपले उदिृदष्ट विहित वेळेत पूर्ण करावे. वृक्ष लागवडीबरोबरच वृक्ष संवर्धनाचा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी सर्व विभागप्रमुखांना केले.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कदम यांनी सांगितले, महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शासकीय वाहने, कर्मचारी किंवा यंत्रणेचा निवडणूक प्रचार विषयक कामासाठी वापर होणार नाही याची प्रत्येक विभागप्रमुखाने दक्षता घ्यावी. शासन किंवा सार्वजनिक उपक्रम यांच्या सेवेत कोणत्याही तदर्थ नियुक्त्या करू नयेत. कोणत्याही व्यक्तीला अन्य कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, आवार भिंत, आदींचा वापर त्याच्या परवानगीखेरीज ध्वजदंड उभारणे, कापडी फलक लावणे, नोटिशी चिटकवणे किंवा घोषणा आदी लिहिण्यासाठी वापर करता येणार नाही. यामध्ये खासगी व सार्वजनिक जागांचा समावेश असेल, असेही त्यांनी नमूद केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. हुलवळे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमाची व तयारीची सविस्तर माहिती दिली.

Protected Content