जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ, विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ.अविनाश आचार्य विद्यालयात इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘लेखिकेस पत्र’ हा उपक्रम नुकताच राबविण्यात आला आहे.
“लेखिकेस पत्र” हे केवळ लिहिण्याचे माध्यम नसून आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहचवण्याचे उत्तम साधन आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या लेखिकेस पत्र लिहायचे होते. इयत्ता तिसरी व चौथीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून विद्यार्थ्यांनी माधुरी पुरंदरे यांना पत्र लिहिले. मुलांनी आपल्या पत्रात मनातील विचार, मत लेखकांना समजावे, लेखकांशी थेट बोलता यावे, आवडत्या पुस्तकांची गंमत सांगता यावी आणि पत्र लेखन कसे करतात हे समजावे, यासाठी शाळेतील मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लेखिकेस पत्र’ हा उपक्रम राबविण्यात आला. यात निवडक 22 पत्र पुरंदरे यांना पाठवण्यात आले. राधांचे घर, बाबांच्या मिश्या, पाचवी गल्ली, नाना, बाबा, माझी शाळा, मुखवटे, लालू बोक्या, परी मी आणि हिपोपटॉमस इ. पुस्तके वाचून मुलांनी पत्राव्दारे त्यांच्याशी संवाद साधला आहे.