पिंप्री खुर्द, ता.धरणगाव (प्रतिनिधी) येथील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी लोकशाही दिनात २०१७ मध्ये चौकशी अर्ज दिला असता अखेर २०१९ मध्ये जि.प. प्रशासनाला जाग आली असून त्यांनी चौकशीसाठी संबंधितांना नोटीस पाठविली आहे. त्यामुळे आता चौकशी केव्हा होणार व संबंधितांवर फौजदारी खटला केव्हा दाखल होणार ? याबाबत मोठी साशंकता सर्वसाधारण जनतेतून व्यक्त केली जात आहे.
यासंदर्भात संतोष पांडे यांनी मार्च व सप्टेंबर २०१७ मध्ये केलेल्या तक्रारीनुसार ही नोटीस पाठवण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता यांनी पिंपरी येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजना व स्वच्छता समिती अध्यक्ष, सचिव आणि ग्रामसेवक यांना ही नोटीस पाठवली आहे. त्यात म्हटले आहे की, ही नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत संबंधित योजनेचे दप्तर एरंडोल येथील जि.प. उप अभियंता यांना उपलब्ध न करून दिल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिलेला आहे.