Home Cities धरणगाव क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतिकेंद्राच्या आराखड्याला मंजुरी: देवेंद्र फडणवीस

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतिकेंद्राच्या आराखड्याला मंजुरी: देवेंद्र फडणवीस


धरणगाव (प्रतिनिधी)  येथे उभारण्यात येणाऱ्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतीकेंद्रासाठी तयार करण्यात आलेल्या 15 कोटीच्या आराखड्यास मंजुरी देण्यात येत असून या केंद्राच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविण्यात यावी. सुशिक्षित आणि सक्षम युवापिढी घडविण्यासाठी क्रांतिकारी आणि प्रेरणादायी विचार समाजापर्यंत पोहोचविले जावे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दरम्यान, हेलीपॅडवर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

धरणगाव येथे क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतीसंस्थेतर्फे आयोजित जनजाती मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक सह कार्यवाहक भैयाजी जोशी, श्री. नायराणस्वामी, संस्थेचे अध्यक्ष श्री. भाईदास सोनवणे आदी उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, क्रांतीकारी खाज्याजी नाईक यांनी इंग्रजांचा अफूचा व्यापार उध्वस्त करुन त्यांना सळो की पळो करुन सोडले. या व्यापारातून निर्माण झालेली इंग्रजांची संपत्ती भारतीयांवर अत्याचार करण्यासाठी वापरण्यात येवू नये असा त्यांचा प्रयत्न होता. त्यांच्या स्मृतीत आदिवासी बांधवांसाठी लोकोपयोगी केंद्र उभे रहावे ही सर्वांसाठी गौरवाची बाब आहे.

जनजाती समाजाचा इतिहास गौरवशाली आहे. जल, जमीन आणि जंगल रक्षणाचे कार्य या समाजाने केले. अनेक संस्थांच्या माध्यमातून समाजाला उपयुक्त असणारे कार्य करताना पारतंत्र्यात इंग्रजांविरुद्ध जोमाने लढा दिला. बाबुराव शणलाके आणि भिमा नाईक यासारख्या क्रांतिकारकांचे कार्य उल्लेखनीय आहे.

आदिवासी कल्याणासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. वनपट्यांचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले आहे. 50 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी नामांकीत शाळेत शिकण्याची संधी मिळाली आहे. पेसामधील आदिवासी गावांना ५ टक्के निधी थेट देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. वनावर आदिवासींचा हक्क असावा यासाठी शासनाचे प्रयत्न असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले.

श्री. जोशी म्हणाले, सर्व भारतीय एक असून देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी केलेले बलिदान देशासाठी प्रेरणदायी आहे. समाजातील वंचित घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी प्रयत्न होत असून शासनासोबत सामाजिक संस्थानी कर्तव्यभावनेने पुढे आले पाहिजे. क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतिकेंद्र विकासासाठी प्रेरक ठरेल असा विश्वास व्यक्त करून केंद्रासाठी तयार केलेल्या आरखाड्यास मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले.

यावेळी श्री.नारायणस्वामी यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला खा.ए.टी.पाटील, आमदार स्मिता वाघ, चंदूलाल पटेल, शिरीष चौधरी, सुरेश भोळे, उन्मेष पाटील, रा.स्व.संघाचे शरद ढोले, राजेश पाटील, चैत्राम पवार आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतिकेंद्राचे भूमिपूजन करणयात आले. मुख्यमंत्र्यांनी खाज्याजी नाईक समधीस्थळाचे दर्शन घेतले. तत्पूर्वी श्री.फडणवीस यांचे हेलिपॅडवर आगमन झाले. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार श्रीमती वाघ, अपर जिल्हाधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांनी त्यांचे स्वागत केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound