पाटणा (वृत्तसंस्था) बिहारचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘सारे मोदी चोर हैं’ या वक्तव्याच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. राहुल गांधी यांच्यावर आपण मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे मोदी यांनी आधीच जाहीर केले होते. पंतप्रधानांनीही या वक्तव्यासंदर्भात राहुल यांना आपल्या टीकेचे लक्ष्य केले होते.
राहुल गांधी यांच्या अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे ज्यांची आडनावे मोदी आहेत, त्या सर्वांनाच ‘चोर’ असे संबोधले गेले आहे. या वक्तव्यामुळे समाजातील मोदी नावाच्या व्यक्तींची प्रतिमा मलीन झाली असल्याचे सुशील मोदी यांचे म्हणणे आहे. हे गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य असून याची शिक्षा राहुल गांधींना मिळायला हवी, अशी मागणीही सुशील मोदी यांनी केली आहे.