बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वीज बिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या बड्या ग्राहकांकडील विजेचे बिल वसुल करण्याची जबाबदारी महावितरणच्या दामिनीनी घेतली असून त्या कारवाईसाठी थेट ग्राहकांच्या दारात पोहचत आहे़त. चालू आर्थीक वर्षाचे केवळ ४ दिवस शिल्लक आहे आणि अजूनही परिमंडळातून १९० कोटी वसूल करण्यासाठी कारवाईला गती देण्यात आली असून प्रतिसाद न देणाऱ्या परिमंडळातील ८ हजार थकबाकीदार ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. घरी कोणी नाही म्हणून महावितरणच्या वसुली पथकाला दाद न देणारे ग्राहक आणि दहा हजारापेक्षा जास्त रूपयाची थकबाकी असणारे ग्राहक दामिनीच्या रडारवर आहे़. दामिनीकडून थेट वीज मीटर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे.
मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनात आणि अधीक्षक अभियंते सुरेंद्र कटके(बुलडाणा), अजय शिंदे (वाशीम)आणि अजितपालसिंह दिनोरे यांच्या पुढाकाराने परिमंडळातील तीनही जिल्ह्यात दामिनी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. एका दामिनी पथकात अतीरिक्त कार्यकारी अभियंता , उपकार्यकारी अभियंतासह १० महिला अभियंता, कर्मचारी सहभागी असून त्यांच्या मदतीसाठी सुरक्षा रक्षक आणि कारवाई सुरू असलेल्या वितरण केंद्रातील तंत्रज्ञाचा समावेश आहे. यासोबतच वित्त व लेखा विभागाकडून बिलासंबधी तक्रार असल्यास ती सोडविण्यासाठी ताबडतोब प्रयत्न करण्यात येणार आहे.
परिमंडळाअंतर्गत घरगुती‚ वाणिज्यिक‚ औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडून १९० कोटी थकबाकी वसूल करावयाची आहे, त्यामध्ये अकोला जिल्ह्यातून ५९ कोटी, बुलडाणा जिल्ह्यातून ९८ कोटी आणि वाशीम जिल्ह्यातून ३३ कोटी ६७ लाख वसूल होणे बाकी आहे. वीजबिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या परिमंडळातील ८ हजार ५०० ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील २ हजार ४९४, बुलडाणा जिल्हा ४ हजार २६२ आणि वाशीम जिल्ह्यातील १ हजार ७४४ ग्राहकाचा समावेश आहे. संपूर्ण वीजबिलासह ३१० रूपये पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय या ग्राहकाचा वीज पुरवठा पुर्ववत करता येणार नाही. त्यामुळे महावितरणची कटू कारवाई टाळण्यासाठी चालू तसेच थकीत वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.