जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील समता नगर येथील वंजारी टेकडीजवळ दोन बंद घर फोडून घरातील सामानांची तोडफोड करत ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील समता नगर परिसरातील वंजारी टेकडी जवळ ईश्वर रामदास चव्हाण व त्यांच्या घराशेजारी त्यांचे चुलत भाऊ अजय प्रल्हाद चव्हाण हे वास्तव्याला आहे. दरम्यान त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्याने दोन्ही घराचे दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातील वस्तूंची तोडफोड केली आणि घरातील गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक मोटर पंप, टीव्ही, होम थिएटर, घरातील भांडी आणि दुचाकी असा एकूण ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. हा प्रकार शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता समोर आला. दरम्यान हा प्रकार लक्षात आल्यानंतर ईश्वर चव्हाण यांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार रविवारी ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुशील चौधरी हे करीत आहे.