बकऱ्या चोरणाऱ्या दाम्पत्याला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कासमवाडी परिसरातून वेळोवेळी १५ बकऱ्या चोरणाऱ्या सर्फराज उर्फ सोनू सईद खान या रिक्षाचालकासह व त्याची पत्नी मजीना सरफराज खान या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी कासमवाडी परिसरातून अटक केली आहे. त्यांनी बकऱ्या चोरीसाठी वापरलेली रिक्षा देखील हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कासमवाडी परिसरातून बकऱ्या चोरी होण्याचे प्रमाण वाढून एका पाठोपाठ १५ बकऱ्या चोरीला गेल्या होत्या. या संदर्भात इंदुबाई रामा माळी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना बकऱ्यांची चोरी सर्फराज खान व त्याची पत्नी मजीना खान यांनी केल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोउनि दत्तात्रय पोटे, दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, सचिन पाटील, ललित नारखेडे, साईनाथ मुंढे यांनी दोघांना रिक्षासह शनिवारी ६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता कासमवाडी येथून ताब्यात घेतले व बकरी हस्तगत केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content