
पुणे (वृत्तसंस्था) कोरेगाव भीमा प्रकरण आणि एल्गार परिषद याचा काहीही संबंध नाही. आंबेडकरी विचारांचा नक्षलवादी विचारांशी संबध नाही. तसेच नक्षलवाद्यांशी संबंध नसलेल्यांवर कारवाई झाली असल्याचे शरद पवार यांना वाटत असेल, तर संबंधित पोलिसांची चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) आठवले गटाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. आठवले पुढे म्हणाले की, ‘मी पवार यांचा पूर्वीपासून समर्थक आहे. नक्षलवाद्यांशी संबंध नसलेल्यांवर कारवाई झाली असल्याचे पवार यांना वाटत असेल, तर संबंधित पोलिसांची चौकशी झाली पाहिजे. पवार यांच्या या मागणीला आठवले यांनी पाठिंबा दिला. तसेच ‘सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत मुस्लिम समाजाला भडकविण्याचे काम कम्युनिस्ट पक्ष आणि उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष करत आहेत,’ असा आरोप आठवले यांनी केला.


